छत्रपती शिवराय पुतळा प्रकरणी खासदार हेमंत पाटील यांचेसह शिवसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे ; तालुका शिवसेनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन
किनवट : वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा प्रकरणी खासदार हेमंत पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिकांवर विनाकारण पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन तालुका शिवसेनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात रविवार (दि. 17) रोजी दिले आहे.
बुधवार (दि. 13 ) रोजी वसमत ( जि. हिंगोली ) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे मिरवणूक काढून शिवप्रेमी जनता व शिवसैनिकांनी मोठ्या हर्षोल्हासात शिवरायांच्या नावाचा गगनभेदी जयघोष करीत नियोजित ठिकाणी अनावरण केले.
छत्रपती शिवरायांप्रती तमाम जनतेत आत्यंतिक प्रेम, आदर व आगाध श्रद्धा आहे. त्यामुळे स्वतःहून मोठ्या संख्येंनी शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून दबावास बळी पडून पोलीस प्रशासनाने प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या खासदारांसह आणि शेकडो शिवसैनिक व शिवप्रेमी बांधवांवर गुन्हे दाखल केले. हे निषेधार्ह व निंदनीय आहे. याबाबत जनतेचा प्रक्षोभ आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाने त्वरित गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात दिले आहे.
निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, तालुका संघटक व्यंकटराव भंडारवार, शहरप्रमुख संतोष येलचलवार, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, युवासेना तालुका प्रमुख प्रमोद केंद्रे, अतुल दर्शनवाड, सुरेश घुमडवार, कपिल रेड्डी, प्रमोद जाधव, शेख अजीज, शेख मोहसीन, तुकाराम मशीदवार, संतोष गीते व खासदार यांचे किनवट येथील जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment