विना परवाना आरो प्लांट चालकाला नगरपालिकेची नोटीस कागदपत्रे सादर करा; अन्यथा आरो प्लांट सील – मुख्याधिकारी
किनवट/ता.प्रतिनिधी- शहरातील १३ जल शुद्धीकरण केंद्र (आरओ प्लांट) मालकांना नगरपरिषद प्रशासनाकडून नोटिसा बजावल्या असून, महाराष्ट्र प्रदूषण विभाग, भूजल सर्वेक्षण व अन्न, प्रशासनाची परवानगीच्या कागदपत्रांच्या पूर्ततेची कागदपत्रे सादर करण्याचे नगरपरिषद प्रशासनाने सूचित केले आहे. अन्यथा प्लांटलाच सील करण्याचा इशारा दिला आहे. नपाच्या या नोटिसामुळे मालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
राज्य शासनाचे प्रदूषण नियंत्रण विभाग, अन्न व प्रशासन आणि भूजल सर्वेक्षण या तिन्ही यंत्रणांच्या परवानगीशिवाय किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणात खासगी आरओ व पाणी फिल्टर प्लांट सरार्सपणे सुरू असल्याचे चित्र आहे. साहजिकच यामुळे नागरिकांच्या आरोग्याच प्रश्न निर्माण झाल्याचा तक्रारी यंत्रणांकडून आल्या आहेत. विंधन विहिरीचे पाणी केवळ थंड करून ते वाटर फिल्टरच्या नावावर खपवून नागरिकांची प्रचंड आर्थिक लूट केली जात असल्याची ही अनेक तक्रारी आहेत.
या प्लांट मालकांनी खरोखर नियमानुसार हे प्लांट सुरू केले आहेत की, शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे सुरू केले आहेत. याची खातरजमा करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगरपरिषद प्रशासनानेदेखील आपल्या हद्दीतील साधारण १३ आरओ वाॅटर फिल्टर प्लांट मालकांना नुकत्याच नोटिसा जारी करून खुलासा मागवला आहे. त्या तिन्ही यंत्रणांच्या परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे सूचित केले आहे. तेही दोन ते तीन दिवसात प्रत्यक्ष स्वतः नगरपरिषद येऊन म्हणने मांडणे आवश्यक आहे. अन्यथा पालिका कुठलीही सबब न एकता वाटर फिल्टर प्लांटलाच सील ठोकणार आहे, असा कडक इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
नगरपरिषदेच्या अशा धडाकेबाज कारवाईमुळे मालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आजतागायत वॉटर फिल्टर प्लांटच्या खऱ्या वस्तुस्थतीबाबत कोणीच दखल घेत नव्हते, त्यामुळे सदर प्लांट मालकांचेदेखील चांगलेच फावले आहे. आता अशा मालकांवर प्रशासनाने वक्रदृष्टी वळविल्याने त्यांचे पितळ उघडे पडणार आहे. मात्र पालिका प्रशासनाने कारवाईबाबत प्रामाणिक, कुठलीही गुळमट भूमिका न घेता ठोस कार्यवाही करण्याची सामान्य जनतेची रास्त अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment