आपल्या.... भारदस्त अभिनयानं तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल्याची नुकतीच बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं होतं. पण विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागच्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले यांच्या जाण्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे.
विक्रम गोखले यांना अभिनयाचे धडे कुटुंबातच मिळाले होते.
विक्रम गोखले यांचं चित्रपटसृष्टीशी जुनं नातं होतं,
वडिलच नाही तर आजी-आजोबाही हाडाचे कलाकार होते.
मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी पुण्यात झाला होता. यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक या सर्व माध्यमात काम केले होते. ते चित्रपटांबरोबरच रंगभूमीवर सुद्धा अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला.
विक्रम गोखले यांच्या आजी हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या भारतीय कलाकार होत्या. इतकेच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके दिग्दर्शित चित्रपटात त्यांच्या आजीने हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केल्याचेही माहिती आहे. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीही 70 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विक्रम गोखले यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान मोलाचं आहे. त्यांचं मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतही मोठं नाव होतं. विक्रम गोखले यांनी 1971 साली अमिताभ बच्चन यांच्या 'परवाना' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय प्रवास सुरू केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली होती.'परवाना' या चित्रपटानंतर त्यांनी डझनभर हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अशा अनेक व्यक्तिरेखा साकारल्या, ज्या संस्मरणीय ठरल्या. संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात साकारलेली ऐश्वर्याच्या वडिलांची व्यक्तिरेखा त्याच्या खास पात्रांपैकी आहे. या चित्रपटात त्यांनी संगीतकाराची भूमिका साकारली होती.
याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अशा दमदार भूमिका केल्या आहेत, ज्यांना प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी भूल भुलैया, मिशन मंगल, दिल से, दे दना दण, हिचकी, निकम, अग्निपथ, विक्रम बेताल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले.
विक्रम गोखले यांना 2013 मध्ये अनुमती'या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याबरोबरच त्यांना 2015 मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. तसेच 2017 मध्ये हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, 2018 मध्ये पुलोत्सव सन्मानाने गौरवण्यात आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आले होते.
मराठी चित्रपटसृष्टीत 'गोदावरी' हा चित्रपट तर 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतील गुरुंजींची भूमिका अखेरची ठरली आहे. विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या निधनाने
सर्वत्र शोकाकूल वातावरण पसरले आहे. त्यांचा अभिनयाची छाप ही कायमच ह्रदयावर अधिराज्य गाजलणारे ठरले आहे...असा हा विक्रमी तारा निखळला आहे.
रूचिरा बेटकर नांदेड
9970774211
Comments
Post a Comment