गंधकुटीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त प्रबोधनात्मक 'काव्यपौर्णिमा' रंगली. प्रत्येक पौर्णिमा काव्यपौर्णिमा : क्रांतीसूर्य प्रतिष्ठान उपक्रम !
किनवट ( प्रतिनिधी ) :
गंधकुटी बुद्धविहार सिद्धार्थनगर गोकुंदा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने 'काव्यपौर्णिमा' घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा साहित्यिक रमेश मुनेश्वर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. गजानन सोनोने, सांगावाकार महेंद्र नरवाडे, कवी रुपेश मुनेश्वर, गायक सुरेश पाटील, कवी प्रकाश सोनवणे उपस्थित होते. उपस्थितांच्या बहारदार काव्य प्रबोधनाने कवी संमेलनात रंगत आणली.
प्रारंभी वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संचालक सुरेश पाटील यांनी वंदनगीत गाऊन कार्यक्रमास सुरवात केली. त्यानंतर राणीसाकार प्रा.गजानन सोनवणे यांनी..
" गातो मी गाणे निळ्या नभाचे
आहे तराने नव्या दमाचे ... "
ही रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी -
" घटनेच्या पानातून प्रतिष्ठा ही मिळतांना
रुढीवादी ग्रंथ मग चाळता कशाला "
ही रचना सादर करून संविधान जागृती केली.
कवी रुपेश मुनेश्वर यांनी -
" इतिहासाचे पान पहा जगी ठरलया महान ,
माझ्या भिमरायाचं देनं भारताच संविधान"
संविधानचा गौरव करणारी रचना सादर करून दाद मिळविली.
बौध्दाचार्य अनिल उमरे यांनी -
" अंधारलेली वाट माझी मी प्रकाशित होताना पाहिले
तू लाविलास दिवा क्रांतिबा ! क्रांतीची मशाल होतांना पाहिली "
ज्योतिरावाच्या कार्याची सुंदर रचना सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.
कवी प्रकाश सोनवणे यांनी -
" भिमाच्या जन्माने जीवनाचे सोने झाले ,
भाग्य उजळले आता संपला अंधार "
ही सुंदर रचना सादर केली.
सुनिता उमरे या कवयित्रीने 'आरक्षण ' नावाची रचना सादर केली तर कवयित्री सत्यभामा भगत (महामुने) ह्याने 'सावित्री ' या नावाची रचना सादर करून टाळ्या मिळविल्या. निवृत्ती नगराळे आणि भगवान घुले यांनी गीते सादर केली.
काव्य पौर्णिमेचा अध्यक्षीय समारोप करताना कवी रमेश मुनेश्वर यांनी -
"पोर्णिमेसम सुंदर असावे आयुष्य
पौर्णिमेसम तेजोमय व्हावे आयुष्य "
असा आयुष्यातील आशावाद निर्माण करणारी रचना सादर केली.
बौद्धाचार्य अनिल उमरे यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास रंजीत वाठोरे, अनिल कानिंदे, सुधीर पाटील, दिनेश खिल्लारे, छत्रपती रिंगणमोडे, राहुल घुले, जनार्दन भगत, सुमेध वाघमारे, सुखदेव कांबळे, प्रशांत शेरे, अनमोल गायकवाड, सुखदेव खिल्लारे, भोसले सर, रवी भालेराव, बालाजी वाढवे यांच्यासह महिला मंडळाच्या अध्यक्षा गोदावरी रिंगनमोडे, केवळाबाई कानिंदे, अरूणाबाई धोटे, रुक्मीना गिमेकार, शिल्पा खिल्लारे, इंदूताई कानिंदे, विजयमाला कावळे, निर्मला घुले, छाया खिलारे आदी काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment