इस्लाम समाजाच्या कुराण धर्मग्रंथाबद्दल अपशब्द काढणाऱ्या रिजवी वर कार्यवाहीची मागणी : टिपू सुलतान ब्रिगेड किनवट
ता. प्र.किनवट:
देश आधीच कोरोना महामारीत आरोग्य, बेरोजगारी, उपासमारी आणि अर्थिक संकटांचा सामना करीत असताना जाणीव पूर्वक देशात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने धार्मिक द्वेष पसरवणारे कृत्य करणाऱ्या वसीम रिजवी या समाज कंटका विरूद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या मार्गदर्शनानुसार टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका शाखेच्यावतीने उप विभागीय अधिकारी, किनवट आणि कदीम पोलीस ठाणे, किनवट अशा दोन ठिकाणी दाखल करण्यात आली. वसीम रिजवी या समाज कंटकाने इस्लामी धर्मग्रंथ कुराणातील 26 आयाती कमी करण्यात यावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, तसेच इंडिया टि. व्ही. ला मुलाखत देताना कुराणाचा संबंध आतंकवादाशी जोडून कुराणामुळे मुस्लिम युवक आतंकवादाकडे वळत आहेत अशा बिन बुडाचे आरोप केले आहेत. यामुळे समस्त भारतीय मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच मुस्लिमेत्तर समाज बांधवांमध्ये गैरसमज पसरविण्याचे कार्य जाणीवपूर्वक करण्यात आले आहे.
टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे जनतेला आवाहन करण्यात आले की आपण संयम बाळगावा व देशात, समाजात शांतता अबाधित ठेवण्यासाठी संविधानिक आणि कायदेशीर पद्धतीने व ज्येष्ठांच्या संमतीने प्रकरण हाताळावे. वसीम रिजवी व त्या विचारधारेचा समूह आधी पासूनच श्रद्धावंत नाही. परंतु काही लोकं वसीम रिजवी यांना बहिष्कृत केल्याचे प्रसारीत करत आहेत. तो स्वत: स्वीकार करतो की तो श्रद्धावंत नाही आणि तो अबु बक्र रजि., उमर रजि., उस्मान रजि., आई आयेशा रजि.,ई. चा तिरस्कार आणि शत्रूत्व करतो म्हणून मुस्लिम समाजाने या समूहाच्या नाटकी प्रचाराला बळी पडू नये. वसीम रिजवी हा वंशवादाचा पुरस्कर्ता आहे. म्हणून वसीम रिजवीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी टिपू सुलतान ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद नदीम, तालुका अध्यक्ष शेख शाकीर, युवा तालुका अध्यक्ष शेख समीर, जमीयते उलेमा हिंदचे मौलाना करीमोद्दिन, मौलाना सुलेमान, सामाजिक कार्यकर्ते शादाब सिद्दिकी इ. उपस्थित होते.
Comments
Post a Comment