आदिवासी महिला अत्याचाराप्रकरणी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यावर कारवाईची मागणी; 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' आक्रमक
किनवट : किनवट लगत गोकुंदा (जि. नांदेड) येथील शासकीय विश्रामगृहात एका पीडित विधवा आदिवासी महिलेच्या विनयभंग प्रकरणी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, या घटनेत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना सहआरोपी करून त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी जोरदार मागणी 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' (महाराष्ट्र शाखा) च्या वतीने करण्यात आली आहे. दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी गोकुंदा (ता. किनवट) येथील शासकीय विश्रामगृहाच्या स्वयंपाकघरात काम करत असताना बालाजी केंद्रे नावाच्या इसमाने पीडित महिलेसोबत अवाच्य भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच या विधवा आदिवासी महिलेला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तिच्या असहायतेचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न केला. या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेने २१ ऑगस्ट २०२६ रोजी किनवट पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अखेर २२ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्ह...