साहित्यिकांनी भूमिका घेऊन लिहिले पाहिजे - अशोक कुबडे -राज्यस्तरीय साहित्य संमेलनाध्यक्षांचे प्रतिपादन - साहित्य लेखनाबरोबर प्रसारणही आवश्यक
वर्धा/ पुलगाव-
साहित्यिक लेखकांनी आपली भूमिका निश्चित करून साहित्य लेखन केले पाहिजे. उत्स्फुर्तपणे आलेल्या विषयावरती लेखन केले तरच दर्जेदार साहित्य निर्मिती होते.नवोदीत साहित्यिकांनी ज्येष्ठ साहित्यिकांचे साहित्य वाचलं पाहिजे तरच आपल्या साहित्याला योग्य दिशा मिळेल अन्यथा आपण भरकटत राहू.
जास्तीत जास्त वाचन करून कमीत कमी लेखन केले पाहिजे अन्यथा या साहित्य लेखनाच्या प्रचंड मोठ्या प्रवाहात आपण सहज वाहून जाऊ.. प्रत्येकाने लेखन आणि साहित्य वाचकांपर्यंत पोहोचणे हे जबाबदारीने केले पाहिजे साहित्य लिहून मोकळे होता कामा नये. साहित्यिकांनी नियोजनबद्धपणे लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिकांनी आपली लेखनाची साहित्य प्रसारणाची एक भूमिका घेऊन साहित्य लेखन केले पाहिजे.
असे प्रतिपादन पुलगाव वर्धा येथे पार पडलेल्या चौथ्या अव्यक्त अबोली राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे यांनी केले.
यावेळी मंचावर साहित्य संमेलनाचे उद्घाटक दीपक नगराळे, स्वागताध्यक्ष मनोहर शहारे,साहित्यिक अशोक वाघमारे, मुख्य आयोजक जयश्री चव्हाण आणि संस्थेचे सचिव योगेश ताटे, कवी हरिदास कोष्टी आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अध्यक्ष अशोक कुबडे यांनी नवोदिकांनी साहित्य लेखन करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी वर्धा जिल्ह्याचा साहित्यिक, सांस्कृतिक,सामाजिक आढावा घेतला तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून आठवण केली.
साहित्य लेखन प्रभावी करण्यासाठी लागणाऱ्या अनेक बाबी त्यांनी भाषणात व्यक्त केल्या. तसेच पंधरा पाणी भाषण लेखी स्वरूपातही प्रसारित केले.
या एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात महाराष्ट्रातून साहित्यिकांची उपस्थिती होती.
उद्घाटकीय प्रास्ताविक शिला आठवले यांनी केले. उद्घाटकीय सत्रा नंतर प्रा. डॉ. भूषण रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली "धर्मराष्ट्र विरुद्ध भारतराष्ट्र" परिसंवाद झाला होता.
त्यानंतर खुशबू बडवाने यांचा "मी सावित्री बोलते" तर कु. स्वराली वाणी यांचा "मी विठ्ठल बोलते" हा एकपात्री प्रयोग झाला...त्यानंतर विद्यानंद हाडके यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा पार पडला. या गजल मुशायऱ्याचे निवेदन प्रसिद्ध गझलकार किरण मडावी यांनी केले तर शेवटच्या टप्प्यात प्रसिद्ध कवी हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले.
या कवविसंमेलनात महाराष्ट्रातून आलेल्या कवींसोबत गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील कवींनी आपला सहभाग नोंदवला होता. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के यांनी केले.
समारोपाच्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक कुबडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनात घेतलेले ठराव वाचन करण्यात आले. ठरावाचे वाचन प्रवीण भगत यांनी केले तर ठरावास अनुमोदन योगेश ताटे यांनी दिले.
अव्यक्त अबोली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुलगाव यांच्यावतीने या चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
हे साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयश्री चव्हाण सचिव योगेश ताटे, मनोहर शहारे, स्नेहल मेंढे,शीला आठवले, राजेश पोफारे,प्रवीण भगत आदींनी अथक परिश्रम घेतले आणि हे साहित्य संमेलन पार पाडले
Comments
Post a Comment