प्रा. डॉ.गणेशराव शिंदे यांच्या जाण्याने शैक्षणिक अपरिमित हानी झाली , विद्यापीठासाठी त्यांचे अमुल्य योगदान - प्रा.डॉ. शेखर घुंगरवार
नांदेड:
प्रा.डाॅ. गणेश शिंदे सरांचा आणि माझा परिचय युवक महोत्सवाच्या माध्यमातून झाला होता. त्यांचा स्वभाव मला खूप आवडायचा ..म्हणून त्यांना सरजी असेच मी नेहमी म्हणतं असे, त्यांना जेंव्हा समजले की मी हदगांव तालुकातला आहे, तेंव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते मला नेहमी 'शेखरराव' असे आदरपूर्वक संबोधीत असत.
हदगांव तालुकातल्या माझ्या नातेवाईकांच्या लग्नाला ते आवर्जून उपस्थित राहात असत . तेंव्हा मला त्याच्याबद्दल अत्यंत आदर वाटायचा... गेल्या २० वर्षात त्यांच्या सहवासात राहण्याचे अनेक प्रसंग आले. मी प्राचार्य झाल्याच समजाच त्यांनी मला पहिला अभिनंदनचा फोन केला होता. कुठेही मोठेपणा मिरवताना त्यांना मी पाहिले नाही. जात पात हा विषय त्यांच्या आचरणात कधीच आढळला नाही. एक कर्तव्यकठोर आणि सतत कार्यमग्न असणे हा त्यांचा स्थायीभाव होता.
विद्यापीठाचा युवक महोत्सव असला की गणेशराव व त्यांचे जीवलग मित्र प्रा.डाॅ.आंबादास कांबळे(हे सुद्धा आपल्या सर्वांना काही दिवसापूर्वी कायमचे सर्वांना सोडून गेले आहेत) हे संपूर्ण कामे अगदी अंगावर घेऊन दिवसरात्र ते काम करायचे. इतकेच नव्हे तर जेंव्हा गणेशराव स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक झाले तेंव्हा युवक महोत्सव अत्यंत हसत खेळत, कोणते गालबोट न लागू देता अगदी यशस्वीपणे त्यांनी युवक महोत्सव संपन्न केले.
त्यांच्या काळात विद्यापीठाची 'नवीन युवक महोत्सव नियमाली' तयार करण्यात आली.आज जी युवक महोत्सवाच्या स्पर्धामध्ये सूत्रबद्धता आली आहे, त्याचे सर्व श्रेय प्रा.डाॅ.शिंदे सरांना जाते, यात दुमत नाही.
अत्यंत हृदयस्पर्शी माणूस, हळव्या मनाचा , कवी साहित्यिक, नाटककार , अभिनेता अशा अनेक क्षेत्रात लिलया आपली छाप सोडणारे ते 'बेताज बादशहा' होते.
विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांचा विलक्षण हातखंडा होता. हरहुन्नरी कलाकार असलेले प्राध्यापक शिंदे सर हे मराठी विषयातले व्यासंगी... अभ्यासक आज आपल्यात नाहीत... . हे मनाला पटत नाही ... गणेशराव तुम्ही इतक्या लवकर आम्हा सर्वांना सोडून जायला नको होते...............
निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐💐
Comments
Post a Comment