ग्रीष्म ऋतूतील ती संध्याकाळ होती. सूर्यदेव अस्ताला गेले होते. तरीपण सूर्यदेवाच्या उष्णतेची दाहकता अजून जाणवत होती. मात्र एक सभा गेले दोन तास रंगली होती. लतादीदी रंगमंचावर उपस्थित होत्या. सभा संपत आली तेव्हा सर्वांनी दीदींना गाणे म्हणण्याचा आग्रह केला. लोकाग्रहाखातर दीदींनी सूर लावला, कोणतेही वादय साथीला नसताना ‘मोगरा फुलला’ हा अभंग लतादीदी गाऊ लागल्या नि वातावरणातील दाहकता अचानक लुप्त झाली. सर्वत्र प्रसन्न समाधानी वातावरण निर्माण झाले आणि याच वातावरणात सभा संपली. हे सामर्थ्य असलेल्याला कलावती लता मंगेशकर आज साऱ्या विश्वात विख्यात होत्या.
आपल्या सुरेल गळ्यातून अक्षरश: हजारो हिंदी-मराठी गाणी गाऊन त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. गेली सहा दशकं, म्हणजे रसिकांच्या तीन पिढय़ा त्यांची सुमधुर हिंदी-मराठी चित्रपट गीतं ऐकत मोठय़ा झाल्या.
त्यांनी 980 पेक्षाही अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली याशिवाय इतर 20 प्रादेशिक भाषांमधूनही त्यांनी गाणी गायली.
लता दीदींचा जन्म 280सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला. फार कमी लोकांना माहीत असेल की, त्यांचं पाळण्यातलं नाव `हृदया' होतं. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे त्या काळातील मराठी संगीत नाट्यसृष्टीतले अतिशय प्रसिद्ध गायक-नट होते. मंगेशकर कुटुंबीयांचे मूळ आडनाव हर्डीकर होते. पण ते मूळचे गोव्यातील मंगेशी येथील राहणारे असल्याने त्यांनी पुढे मंगेशकर हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. लता दीदींच्या आईचे नाव शुद्धमती त्यांना सर्व जण माई या नावाने संबोधत असत. लता दीदी हे दिनानाथांचे सर्वांत ज्येष्ठ अपत्य. दिनानाथ आणि माईंना लता, आशा, उषा, मीना या चार कन्या आणि हृदयनाथ हा मुलगा अशी पाच अपत्ये झाली. पुढे दिनानाथांप्रमाणेच या सर्वांनी संगीत क्षेत्रात खूप नावलौकिक मिळविला.
लता दीदींना अर्थातच पहिले गुरू लाभले ते म्हणजे खुद्द त्यांचे वडील पंडित दिनानाथ. त्यामुळे केवळ वयाच्या पाचव्या वर्षापासून दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांत बाल-कलाकार म्हणून कामं करण्यास सुरुवात केली.
भारत सरकारने लतादीदींना ‘भारतरत्न’ हा किताब दिला, तेव्हा मनात आले की, या उपाधीने त्यांचा गौरव झाला की त्यांच्यामुळे प्रत्यक्ष या उपाधीची झळाळी वाढली? लता मंगेशकर यांना आजवर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर पुरस्कार मिळाले आहेत.
‘स्वरभारती’, ‘कलाप्रवीण’, ‘सूरश्री’, ‘स्वरलता’ व ‘डी. लिट.’ असे अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पण या यशामागे अथक परिश्रम आहेत. यशाचा मार्ग हा काट्याकुट्यांतून जातो. अनेक कसोट्यांतून उतरल्यावरच सुवर्णाचे तेज झळाळते. या उक्तीनुसारच आज साऱ्या दिक्कालाच्या मर्यादा ओलांडून लतादीदी या कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहेत. संगीताच्या क्षेत्रात त्यांचे स्थान सर्वोत्कृष्ट व सर्वमान्य आहे.
दीदींच्या गळ्यात ‘गंधार’ आहे, याची कल्पना त्यांच्या बाबांना-दीनानाथांना होती. ते दीदींना सांगत, “लता, तुझ्यावर ईश्वराने कृपा केली आहे, गळ्यातला गंधार सांभाळ.’ लतादीदींनी आपल्या पित्याचे वचन आयुष्यभर सांभाळले.
लतादीदींच्या स्वर्गीय मधुर आवाजाने असंख्य गाणी चिरंजीव झाली आहेत. मराठी माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दीदींच्या आवाजातील ओळी आपल्याला साथ देत असतात. असे वाटत...
‘आनंदघन’ या नावाने त्यांनी संगीत-दिग्दर्शनही केले. त्यांनी गायलेले ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गीत ऐकून पं. नेहरूंच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते. आजही हे गीत भारतीयांचे डोळे ओले करते.
अगदी लहान वयात दीदींनी आपल्या बाबांबरोबर नारदाची भूमिका केली होती. तसेच काही मराठी चित्रपटांतूनही छोट्या भूमिका केल्या.
लतादीदींच्या अतीव सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून दिले. त्यांच्या आवाजाच्या विलक्षण लवचीकपणामुळे, अलौकिक फिरतीमुळे चित्रपट संगीतकारांना नवनवीन प्रयोग करणे शक्य झाले. ‘तीन मिनिटांच्या तबकडीतून लोकांपर्यंत संगीत पोहोचवण्याचे अवघड काम लताने केले,’ असा त्यांचा गौरव प्रत्यक्ष कुमार गंधर्वांनी केला होता.
आपल्या भावंडांसाठी, आपल्या कुटुंबासाठी लतादीदींनी जे अतोनात श्रम केले, त्यांची आठवण आजही त्यांना, त्यांच्या भावंडांना व्यथित करते. अत्युच्च पदावर पोहोचूनही या थोर कलावतीने विनम्रपणा सोडला नाही. आपली सामाजिक जबाबदारीही त्या विसरल्या नाही. पुण्याचे ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ हे त्याचेच दयोतक आहे. अशी ही गानकोकिळा भारतवर्षाचे अक्षय वैभव होते.
"मेरी आवाज ही पहेचान है...." म्हणतं त्यांनी जगाचा निरोप घेतला..
रूचिरा बेटकर, नांदेड
Comments
Post a Comment