माझ्यातला 'मी' पण गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी.....
''टाळी वाजवून, ताल धरावा
अन्
चालावी वाट ती पंढरीची''
पंढरीची वारी, मग ती आषाढीची असो वा कार्तिकीची, या दोन वाऱ्या म्हणजे वारकऱ्यांचा मोक्षमार्ग.
पावसाळा सुरु झाला की आषाढातील पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे.
ज्ञानोबा - तुकारामचा जयघोष करीत कोणीही या आनंदयात्रेत सहभागी होऊ शकतो, नाचू शकतो, गाऊ शकतो. साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराज, भक्तराज नामदेव महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, सोपानकाका, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, संत जनाबाई, संत सावता माळी,निळोबाराय, संत चोखोबा अशा अभंगरूपाने अजरामर झालेल्या संतांच्या सान्निध्यात तब्बल पंधरवडा चालण्याचे भाग्य या काळात लाभते.
महाराष्ट्रातील विविध जिल्हे , तालुके, गाव,खेड, पाडे, तांड्यातुन, दिंडया येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंडया येतात. नदीला अनंत अडचणी आल्या तरी सर्वांना जीवन देत पुढे सागराशी एकरूप होण्यास आतुर झालेली असते तशीच ही विठ्ठल भकत्तीची गंगा, चंद्रभागेच्या काठाशी असणार्या पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप होते ती वारकरी सोहळ्याच्या रूपात.
वारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सदगुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्तीचा नुसता अविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करतांना पांडूरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती. त्यात कोणी उच्च नीच नव्हते, कोण्या एका जातीचे संत नाहीत. संतकवी कोण्या एका गावाचे नाही घराण्याचेही नाहीत.
सेना-न्हावी, सावता 'माळी', नामा 'शिंपी', गोरा 'कुंभार, नरहरी 'सोनार' कान्होपागा 'वारांगना', एकनाथ 'ब्राह्मण', तर चोखा 'महार'! अशी एकात्मतेती शिकवण. विठ्ठलाच्या गावा जावे! विठ्ठलरूप व्हावे हेच सत्य. विठ्ठलाला माऊली मानणार्या या संताच्या मनात विठ्ठल ही प्रेम-वात्सल्याची मुर्ती आहे.
प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यसाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोहचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलने होतात. चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकर्यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकर्यांचे सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतानी दाखविली. आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे.
अहो! एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी सहलीला येणार्यांची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचं तसं नाही वारी ठराविक तिथीला निघते आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्याच्या भोवती दिडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुठं, सगळं काही ठरवल्यासारखं. 'गोपालकाल्यात' सर्वांच्या शिदोर्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रांपचिक दु:खेही वाटून घेतात.
दिंडीत लाखो लोक का सामील होतात, आपले घर-दार, काम-धंदा सोडून ते पंढरीच्या वाटेवर का येतात, असा प्रश्न लोक विचारतात. त्यांचेही बरोबर आहे. या दिंडीच्या वाटेवर ना चांगली राहण्याची व्यवस्था, ना झोपण्याची सोय, पण तरीही लक्षावधी जनांचा प्रवाहो एका विठ्ठल नामाच्या मंत्राने प्रवाहित होऊन चालत असतो. त्याच्या चालण्याला ग्यानबा-तुकारामचा ठेका असतो. टाळ- मृदुंगातून उमटणारा जय जय रामकृष्ण हरीचा गजर असतो, त्यामुळे कोणत्याही लौकिक सुविधांची पर्वा करायला त्याच्याकडे वेळच नसतो.
पंढरपूरची वारी म्हणजे वारकऱ्यांच्या आयुष्यातील आनंदपर्वणीच असते. `विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी' असे उच्चरवाने गाणारा वारकरी या आनंदयात्रेत मोठ्या उत्साहाने , आनंदाने सामील होतो. वारी म्हणजे महाराष्ट्राचा कुलधर्म आहे.
वारीच्या निमित्ताने,
"लक्ष लक्ष पाऊले... सुखी संसाराची तोडूनिया गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट..".
वारकऱ्याचे सारे लक्ष विठ्ठलनामात गुंतलेले असते आणि नामातून, भजनातून, कीर्तनातून मिळणारा आनंद फक्त त्याच्यापुरता नसतो, तर तो अवघ्या आसमंतात साठलेला असतो.
दिंडी जसजशी पुढे सरकते तसा सगळीकडे उसळतो विठ्ठल नामाचा नाद-गंध. पावसाच्या शिडकाव्याने सारा परिसर आधीच अभिमंत्रित झालेला , त्यावर एक वर्ख चढवा तद्वत नामाच्या कल्लोळाने चराचरावर एक प्रकारचा हळवा ओलावा पसरलेला असतो. रस्त्यावरील माती ज्याच्यासाठी अबीर-गुलाल त्या वारकऱ्याचा अवघा देह पदोपदी नाचत-गात बोलत असतो. दिंडी ही अशी बेभानपणे अनुभवायची असते, आत्मभान जागवत जगायची असते. वारीत सगळ्याचा विसर पडतो, दिंडीतील प्रत्येक पावलागणिक तुमचे पद, प्रतिष्ठा , परिवार सगळे काही मागे पडत असते, कारण वारकऱ्यांची नजर पंढरीच्या पांडुरंगाकडे लागलेली असते, कानात संतांच्या अभंगवाणीचा गजर घुमत असतो. हा असा स्वर्गीय सुखाचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा...
रूचिरा बेटकर, नांदेड
9970774211
Comments
Post a Comment