पुणे: काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले आहे. उद्या सोमवारी हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव शरीर हिंगोलीत आणण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली.
राजीव सातव यांचे आज पहाटे 4 वाजून 58 मिनिटाने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेली त्यांची कोरोना विरुद्धची झुंज आज संपली. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली. सातव यांचे पार्थिव पुण्याहून हिंगोलीकडे रवाना झाले आहे. रुग्णवाहिकेत सातव यांची आई, पत्नी आणि इतर अप्तेष्ट आहेत. उद्या सकाळी कळमनुरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल, असं सूत्रांनी सांगितलं.
सातव यांच्या निधनाच्या वृत्ताने व्यथित: राज्यपाल
राजीव सातव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तरुण व तडफदार खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून व्यथित झालो. सातव करोनावर मात करून लवकरच बाहेर येतील असे वाटत असतानाच ही दुखद बातमी आली. सातव यांच्याकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेला नेता आपल्यातून हिरावून नेला आहे. त्यांच्या आत्म्यास प्रभुचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
प्रतिभाशाली उमदे नेतृत्व हरपले: चव्हाण
आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते. सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
सातव यांचा अल्प परिचय
45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर बोलत असायचे.
चार वेळा ‘संसदरत्न’
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या:
राजीव तू हे काय केलेस? तुला कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहू; संजय राऊत भावूक
राजीव सातव यांच्या जाण्याने आम्ही प्रतिभाशाली नेत्याला मुकलो: प्रियंका गांधी
महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त, मोठा धक्का बसलाय : शरद पवार
Comments
Post a Comment